पानं

Wednesday, March 17, 2010

वैभव केर कचऱ्याचे

केर म्हणे केरसुणीला
का रोज रोज फटकारते?
सकाळ ,दुपार ,अन संध्याकाळ
तिन्ही त्रिकाळ का रागे भरते !

'केर कचरा' आमचे असणे
महत्व तुझेच ते वाढते ,
नसता आम्ही ,उभी राहाते
गर्दन झुकवून ताठा जाते !

कधी टाकते मान कोपऱ्यात
कधी दारा पल्याड लपते
इंच वितभर जागा काय ती मिळते...
गरूर ताठा तू सर्व विसरते !!

आता वैभव ऐक आमुचे
जागेची न आम्हा उणीव असते
वाट्टेल तिथे ,वाट्टेल तेव्हा
उकिरडे बनविणे हा हक्क असते !!

अस्ताव्यस्त हि आमची महती
अजागळता हा गुण महान तो
आळशी लोक आमचे दैवत
पुजतो आम्ही त्यांना गुरुवत !!!

No comments:

Post a Comment