पानं

Sunday, March 12, 2023

नितीन राव

 

साला मैं तो साहब बन गया अरे,

 साला मैं तो तो साहब बन गया, 

हैं रे, साहब बनके कैसा तन गया 

ये बूट मेरा देखो, ये सूट मेरा देखो

 जैसा गोरा कोई लनढन का, हा!

            अशा अविर्भावात कुणीही नाचलं असतं जर साहेब म्हणून बढती शासनाने दिली असती ...पण बढती नितीन देवाना मिळाली तर क्वचितच त्यांनी ती शेअर केली असती ...नाचणे तर दूरच राहिले !!

           आमच्या पिढीला ग्याझेंटेड ऑफिसर म्हणजे काय माहिती नाही .त्यात शासकीय नोकऱ्या पासून आम्ही वंचित ! त्यातल्या त्यात एखादं दुसरे अधिकारी झालेले .. त्यात नितीन देव ...देवा देवा !


तर आमचा नितीन डेप्युटी इंजिनिअर झाला ! त्रिवार अभिनंदन ! 



"नितीनरावांना दे बरं फोन त्यांना विश करतो '

" तुझ्या तोंडून राव वगैरे चांगले नाही वाटत ..

तू नितीनच म्हण जवळीक साधल्या जाते.. '  

हो राणी पती नितीन आमचे लग्नापूर्वी पासूनचे मित्र ! बहीणजावई झाल्याने त्यांना कधी राव चिकटले नाही , जसे गणेश पदे ! यांना आम्ही " अरे तुरे ' तच ठेवलेले . दोस्त कधीही नातेवाईकांनपेक्षा अधिकच जवळचे असतात . .. 

    तर असे हे जावई .. अधिकाराने "जा वाया' सारखे कधी वाया न गेलेले , शिस्तीतले आयुष्य जगलेले नितीन देव !

      आज आमच्यासाठी अतिशय आनंदाची बाब म्हणजे आमचा नितीन आता साहेब झाला ! नितीन देव डेप्युटी इंजिनिअर म्हणून बढती मिळवता झाला . आजच्या आरक्षण परिपेक्ष नितीन वर नवी जबाबदारी येणे खरच आनंदाची बाब आहे . 

        मला माहित आहे नितीनला याचे अप्रूप मुळीच नाही किंबहुना " स्केल तर कधीचीच लागू झालेली .आता नव्या कटकटी 'असा भाव सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर शक्य आहे .

     मला आठवते स्व भाऊंचे प्रमोशन .यवतमाळ ला प्रमोशन मिळाले त्यांनतर आम्ही जायकवाडी ला आलो अन देवकाका मिळाले ...अन देव कुटुंब आमचे झाले . राणी मुळे नात्यात परिवर्तीत झाले . 

      खरे तर मला नोकरी करणारेच आवडत नव्हते तेव्हाही अन आताही . त्यात नितीन नी बिल्डर शिप सोडून नोकरी जॉईन करणे मी विरोधच केला होता पण तात्या भाऊ च्या विचाराने नितीन जॉईन झाला .आज किमान त्या निर्णयाचे चीज झाले .भाऊंना नक्कीच आंनद झाला असता नागपुरात जाऊन सेलेब्रशन झाले असते .एकतर नितीनचे भारी कौतुक अन त्याबरोबर त्याची कौतुकी बायको . असो 


नितीन अतिशय सहृदयी , घरातला सायलेंट प्लेयर, (...घरात कुणीतरी असावा लागतो ! ) फास्ट (याच्या स्कुटर वर मागच्या सीट वर बसा ....एस्सेल वर्ल्ड चा अनुभव मिळेल ..... भरभर उरक असलेला , न बोलता खूप काही अचिव्ह करणारा .... 

            नितीन खूप खूप अभिनंदन . आणिक यशासाठी शुभेच्छा . राणी ,श्रेयस, तेजा तुमचेही अभिनंदन मनःपूर्वक !!



                                                 -अगस्ती 

      

       


संजय केणेकर

 भारतीय जनता पक्षाचा हाडाचा कार्यकर्ता ..." लक्ष शिखर की ओर अग्रेसर ' ठेवणारा कार्यकर्ता ! आता नेत्याच्या भूमिकेत असतानाही आपल्यातला कार्यकर्ता जीवंत ठेवणारा , दिल्ली मुंबईत सगळ्यांना 

आपला वाटणारा " संजू ' संभाजीनगरकरासाठीचा संजुभाऊ आज आपला वाढदिवस सत्कारणी लावत आहे. आपल्या कार्यकर्त्यांना यानिमित्ताने सामाजिक उपक्रम करण्यासाठी प्रेरणा देत आहे. "रंजल्या गांजल्यासाठी काही करा रे बाबांनो ' म्हणत आपल्या कार्यकर्त्यांना घरोघरी फिरवत आहे.... मोदीजींच्या देवेंद्रजींच्या कल्याणकारी योजना जनतेच्या दारात पोहोचवण्यासाठी पळत आहे.


होय आमचे लाडके शहराध्यक्ष संजूभाऊ केनेकर यांच्याबाबत मी बोलत आहे. संजू भाऊ केणेकर महानगरपालिकेमध्ये उपमहापौर पदापर्यंतचा प्रवास पूर्ण करत, आपल्या कार्यकर्त्यासाठी आपला वार्ड मोकळा करत संघटनेच्या जबाबदाऱ्या अंगा खांद्यावर घेणारे..... जे सहसा पाहायला मिळत नाही.... बराच मंडळींना क्रित्येक टर्म घेतलेल्या नगरसेवकांना वार्ड सोडवत नाही मनपा चे आकर्षण जात नाही . .. 

        संजुभौची जातकुळी वेगळी ! त्यांनी मनप सोडली , आपल्या कार्यकर्त्याला संधी दिली अन् त्यांनी कामगार मोर्चाचे प्रदेशाचे नेतृत्व स्वीकारले आणि व्यवस्थित निभावले. शहराचे दायित्व स्वीकारले. गेल्या तीन वर्षात भारतीय जनता पक्ष शहरात चैतन्य भरले, झंजावात निर्माण केला अनेक आंदोलन उभी केली भाजपाला शिखरावर नेण्यासाठी सतत उपक्रम राबवले. राज्यातील भाजपा विरोधी सरकारमुळे अत्यंत विपरीत परिस्थितीत त्यांनी शहराला नेतृत्व दिले.

"राष्ट्र प्रथम , नंतर पक्ष अन् शेवटी स्वतः ' या अत्युच्च विचारांनी प्रेरित पक्षासाठी


प्रश्न अनेको कदम निरंतर ... 

         बढे परम वैभव के पथ पर. ... 


    अशा भावना मनात ठेवून आपल्या ध्येया त अग्रेसर असणाऱ्या संजू भाऊंना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. ... सदा हसतमुख, निरामय चिरायू आयुष्याच्या शुभकामना - 

मंगलमूर्ती शास्त्री

शहर (जिल्हा) उपाध्यक्ष भाजपा संभाजीनगर 





दिलीप जी धारुरकर

               सहा जुलै सकाळी शाखेत प्रार्थना झाली , तेरा तारखेच्या गुरुपौर्णिमा उत्सवाच्या चर्चा सुरू झाल्या . प्रमुख वक्ते कुणाला बोलवायचे ? 

        माझ्या समोर एकच नाव होत "यावेळी दिलीपजी धारूरकर यांना बोलावू या का ? '

         सगळ्यांनी एकदम माना डोलवल्या. खणाळे काका म्हणाले तुम्ही त्यांच्या आज बोलून घ्या ! मी आत्ताच बोलतो म्हणत मोबाईल काढला ... इतक्या सकाळी नका करू त्यांची तब्येत ... वगैरे काकांनी म्हणेस्तोवर माझा फोन दिलीपजीनी उचललाही !! 

       अन् तेव्हा त्यांची तब्येत त्यांना बाहेर पडू देत नाही हे कळले ! ! आपण भेटायला जाऊ वगैरे शाखेत बोलणे झाले .. प्रत्यक्षात आज अखेरचं फोनवरच बोलणं ठरेल असे वाटले नाही ! जे घडले . दिलीपजी खूप मोठ्ठं व्यक्तित्व . 

सिंचन विभागात अभियंता असणारे दीलीपजी एक दिवस ती आश्र्वासित नोकरी सोडून देतात ... राष्ट्र निर्माण साठी , तरुण भारत साठी ! मला प्रचंड आदर होता त्यासाठीच .

         तरुण भारत एक कठीण काम ! निव्वळ ध्येयासाठी समर्पण म्हणावे ! जिथे तूट पंजी आमदनी , ती ही बे भरवशाची ...अन् त्याकरिता शासकीय नोकरीचा त्याग . 

तरुण भारत नंतरचा त्यांचा कठीण काळ.घर गृहस्थी चालवायला बाल मासिक सुरू करणे अन् फिरणे वगैरे .. 

आज सगळ आठवतंय . माझ्या साठी दिलीप जी हक्काचा माणूस . शाखेत ऐनवेळी वक्ता हवा मग करा फोन , वेळ असला तर नक्कीच देणार !कुठलेही कारण कधी सांगितले नाही ... पहिल्यांदा कारण सांगितले " करोना आफ्टर एफेक्ट्स ' वगैरे म्हणाले . मात्र ते एफेक्ट्स इतके गंभीर असतील असे वाटले नाही . 

         दिलीपजी माहिती आयुक्त पदावर असताना बरेचदा भेटलो . कधी कामा निमित्त तर कधी उगाच ! त्यांनी पद स्वतः मध्ये शिरू दिले नाही .. या गप्पासाठी . अन् वहिनी ही भजे वगैरे तयार ठेवणाऱ्या अशा ! 

       " कर्म करे हम निरलस पल पल , दिनकर सम हम सदा जले ' आपल्या कृतीतून उतरवणाऱ्या , निष्ठावान स्वयंसेवक दिलीपजीना आमच्या अभिमन्यू प्रभात शाखेतर्फे विनम्र श्रद्धांजली .


-मंगलमूर्ती शास्त्री 



       

         

विद्या ताई

 

निवृत्त झालेल्या प्राचार्या सौ विद्याताईचा थोडक्यात परिचय "माझ्याकडे जरा राहाती ये पंधरा दिवसासाठी , आता दोघेही रिटायर्ड आहात ' 

  म्हटले की

   " हो ना खूप दिवसांचे यायचे आहे पहिले हेरंब कडे सुध्दा जायचे आहे रे ' 

            बोलणारी विद्याताई खरेच हेरंब विषयी जास्त आत्मीयता ठेवून आहे अन् कारणही तसेच .. त्याचं सायन्स दहावीला तिने रटवलेल , त्यात त्याला प्रावीण्य मिळवून दिलेले ! हेरंब पुढे BVsc झाला त्यात ताईंचा वाटा महत्वाचा ! विद्याताई त्यावेळी Bsc झालेली मला वाटतं कदाचित लग्नानंतर MA English , बीएड केले अन् न्यू इंग्लिश ज्युनियर कॉलेज ला रुजू झाली . तत्पूर्वी अकोल्याला तीनचार वर्ष हेच कार्य..विद्यार्थी घडविण्याचे ... 

       ताई आज प्राचार्या म्हणून निवृत्त झाली तरी शिकवण्याची खुमखुमी अजून गेली नाही . तिनी लॉ मध्ये ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन करत , LLM पूर्ण करून ठेवले आता लॉ कॉेलेजमध्ये गेस्ट लेक्चर घ्यायला सिद्धच आहे. गेली 34 वर्ष शिक्षण देणं अन् घेणं चालूच आहे अविरत .

     आमच्या सगळ्या सगळ्या मावश्यांमध्ये सगळ्यात प्रेमळ ,मृदु मावशी ,मला नाही वाटत ती कधी चिडली असेल कुणावर , मालू मावशी वडोडकर, घर स्टेशन जवळ अकोल्याला , मोठी असल्याने येणाऱ्या जानाऱ्यांचा प्रचंड राबता , तब्येतीने ग्रासलेली ... मालुमावशी तरीही मला तरी हसतमुखच आठवते ! त्यामुळे आमचाही अधून मधून धुडगूस असायचाच मावशीकडे ! अन् या आईच्या संस्कारात वाढलेली विद्याताई . हसतमुख सदैव . 

         बस अशीच असू दे ताईला , नी वृत्ती आनंदी असू दे उर्वरित उदंड आयुष्यावर ! निवृत्त ती नक्कीच होणार नाही या खात्रीनं आम्ही निश्चिंत आहोत कारण ताईला जोडीदार मिळाला विकासरावांसारखा ! जीवन जगणारा ... प्रुफ आपला ग्रुप मधुघट आहे . गीत संगीत वाचन लेखन पर्यटन अशा बहु आयामाने जीवन समृध्द करणारा ! 


अगस्ती 




भगवान राव काका

          मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून मुक्तिसंग्रामाचे अर्ध्वयु स्वातंत्र्य सैनिक ऍड भगवानराव देशपांडे काका यांची सतीश नारखेडेंसह भेट घेतली. खरंतर काकांची प्रत्येक भेट ही ग्रेट भेट असते . 

          काका म्हणजे मुक्तिसंग्रामाचा चालता बोलता इतिहासच. काकांनी बोलत राहावं आणि आपण एकत राहावं तृप्तता अशी होतच नाही.

   या वयातही खिलाडी वृत्ती सांभाळणारे , निर्भीडता जपणारे काका म्हणजे आश्चर्यच आहे.

     आज काकांचा मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे सन्मान करण्यात आला. या वयात शरीरातील व्याधींचे लाड करत काकांनी उभे राहत माईक हातात घेतला एक तास मुक्ती संग्राम उपस्थितांना ऐकवला . उपस्थित सर्वांना अवाक केले.

    काकांना बोलताना कुठल्याही नोट्स काढाव्या लागत नाही, कुठलीही विशेष तयारी करावी लागत नाही. सगळे कसं डोळ्यासमोर उभे करतात..,

       आज काका विशेष खुश होते आणि कारणही तसेच होते. त्यांच्यातला "बाप 'आनंदी होता. त्यांच्या चिरंजीवांनी प्राध्यापक संजय देशपांडे मुंबई यांनी मास्को मध्ये स्वर्गीय अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभे करण्यासाठी घेतलेल्या अथक प्रयत्नांना मूर्त रूप , महाराष्ट्राच्या लाडक्या माननीय देवेंद्रजींच्या उपस्थितीत मिळालेले काकांनी पाहिले !

      प्रा संजय देशपांडे यांचा मास्कोमध्ये सत्कारही झाला. मागे प्रा संजय यांचा सरसंघचालक डॉ मोहनजी भागवत यांच्या शुभहस्ते सत्कार झाला होता. वडील म्हणून भगवानराव काकांचा आनंद ओसंडून वाहत होता ...

      काका नंदिग्रामचे आपले सहनिवासी होणे ही आपली पूर्वपुण्याईच म्हणावी लागेल. 

        

         मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त काकांना नमस्कार . काकांची चौख काळजी करणाऱ्या काकूंसह, दीर्घायुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !


- मंगलमूर्ती शास्त्री

DVK

  " कसा आहेस मित्रा ' आपण फोन करावा अन् या प्रश्नाने संवाद सुरू व्हावा. खरे तर वयाने वडील असलेला, आणि अस्मादिकांनी " महागुरू ' पदी बसवलेला दिपक कुलकर्णी , माझेसाठी दादाच ! 

            मित्रांचा गोतावळा यातच ऐश्वर्य मानणारे आमचे गुरुवर्य खेळाडू तर आहेतच खिलाडी वृत्तीने जगतात. बंधूंचा फोन आला आणि ठाहाके लागले नाहीत असं होणार नाही ! वास्तविक एक प्रथितयश आर्किटेक, यशस्वी बिल्डर , उद्योजक सारंग सोसायटी अध्यक्ष , क्रेडाई चे ॲक्टिव मेंबर अशा बिरुदावल्या सांभाळत हसत खेळत कसं जगाव यांच्याकडून शिकावं ! 

          टेबल टेनिस , बॅडमिंटन , क्रिकेट सर्व दूर यांचा संचार असतो . त्यामुळे दोस्तानाही खूप. वार्षिक टूरटूर मित्रांबरोबरचेच जास्त असावेत . ... 

            एक बहुमुखी व्यक्तित्व , आपण हरपनमौला म्हणू शकतो असे आमचे दीपक दादा , त्यांची इच्छा नसली तरी वयाने वाढत आहेत . वाढदिवसाचे चक्र पूर्ण होणारच आहे , दरवर्षी येणारच अनेकानेक वर्ष ! मनानं उदंड आयुष्य तरुण राहोत ... 

     

प्रार्थयामहे भव शतायु:

ईश्वर सदा त्वाम् च रक्षतु।


म्हणत असतानाच ...

पुण्य कर्मणा कीर्तिमार्जय 

जीवनम् तव भवतु सार्थकम्।।


       सामाजिक जाणिवातही समृद्धी येवो , कीर्ती वाढो हि रेणुके चरणी प्रार्थना !  


मंगलमूर्ती शास्त्री 

जयेश चा वाढदिवस

 अत्यंत तूटपुंज्या साधनासह ,अतिशय नीट नेटका मनातून साजरा झालेला वाढदिवस .... 

                काल राजू अन् देवका राजपूत यांनी आपल्या दुसऱ्या मुलाचा वाढदिवस दणक्यात साजरा केला , मला उपस्थित राहून शुभेच्छा देण्याचे भाग्य लाभले .

          शुभांगी अजित गर्दीत ट्रेन सफर करत हजर राहिले न राहता करतील काय ? देवकाचं आमंत्रणच एकदम कडक ! 

 मी अन् मिनल पलीकडच्या वार्डात सार्वजनिक नवरात्री उत्सवाच्या आरतीला यजमान म्हणून गेलो तर " माझ्या कार्यक्रमाला तुम्हाला आरती घ्यायची होती का ? ' म्हणत बोलणे ऐकवते . बाकी आरत्या रद्द करत पहिले वाढदिवस ... 

वाढदिवस तर करायचा , शे पाचशे लोकांना बोलवायचे हा ध्यास घेवून दोघं नवराबायको कार्यरत झाली . जागा ? प्रश्न सोडवला घराशेजारील प्लॉट राजू नी स्वतः स्वच्छ केला . त्यावरची घाण केर कचरा काढून , त्यावर छोटेखानी मंडप ! सर्व सजावट दोघांनी केली ... 


जयेश चे नाव थरमोकोल च्या बॉक्स वर कोरलेले घरीच ! फुगे , झिरमाळा ,छान कुंड्याणी, जमिनीवर आर्टिफिशियल पानांनी केलेली सजावट . सगळे कसे नीट नेटके . आपल्या मुलाचा वाढदिवस तर दणक्यात व्हायलाच पाहिजे . दोघा नवराबायकोची , काका मामा मावश्याची धडपड पाहण्याजोगी . 

       आनंद इतका निश्चित देवून गेली का एखाद्या स्टार हॉटेल मध्ये केलेल्या कार्यक्रमाला लाजवेल . 

       फोटोग्राफर भाचाच ! दालबाटीचा बेत , आचाऱ्याची भूमिका भावांनी निभावलेली . टेस्टी बाटी केलेली , लाडू हि घरीच वळलेले . 

        चाळीसेक किलोची दालबाटी, उपवासवाल्यांसाठी खिचडी असा बेत होता . शेजारी पाजारी तसेच नातेवाईकांच्या सहभागाने उत्साहात संपन्न झालेला पहिला वाढ दिवस अत्यंत कौतुकास्पद असा ! 

      आम्ही हॉटेल बुक करतो , पाचसाताशे रुपये पर प्लेट खाऊ घालण्यासाठी लोकांना बोलवतो . जे येतात त्यांच्या कपाळावर आठया मोजव्या !!! येणारा चेहऱ्यावर उगीचचचे हसू आणत, आनंद दाखवत , खाण्याची प्लेट बुफे मधून घेताना , ज्याच्या कार्यक्रमाला आलाय त्याच्यावर असंख्य उपकार केल्याच्या भावनेनं येत आपला कार्यक्रम संपन्न करतो . ... खरच असा आनंद जेथे साधनांची अनुपलब्धता आहे , कमी आहे, सगळे सांभाळून घेत आहेत ,मिळून कार्य पार पाडत आहेत हे चित्र असते का ? 

              कार्यक्रमाला येणारा काही गिफ्ट वगैरे देऊन झाल्यावर किती लवकर पळ काढता येईल याचीच तयारी चालवतो . खरच त्यांना आनंद असतो का ? बरीच मंडळी औपचारिकता निभावतात ... जेथे "कमी ' तेथेच आनंद मिळतो मग प्रश्न पडतो आपण समृद्धीच्या मागे का लागतो ? मला घर पाहिजे बंगला पाहिजे गाड्या पाहिजेत .. खरंच या गोष्टी आनंद देतात ? 

            अनुप्लभतेत काही करण्याचा आनंद असतो काही नसतानाही मिळवल्याचा आनंद . नाही तर फेकला पैसा कॉन्ट्रॅक्टर सजावट करतो , केटरर्स बुफे... अन् आनंद देण्याचा कॉन्ट्रॅक्ट कोण देईल ? 

        जे असाध्य जे सुदूर त्यात जीव पावे म्हणतात तेच खरे नाही का ?

      देवका अन् राजू यांचे सह जयेशला मनपुर्वक आशिष ! 




पहाट झाली त्याची अन् तिची

 पहाट झाली त्याची अन् तिची 


तिची पहाट झाली 

झाडझुडीची वेळ झाली 


तिची पहाट झाली 

चहा ठेवायची वेळ झाली 


तिची पहाट झाली 

भाजी आणायची वेळ झाली 


तिची पहाट झाली  

संसार रेटण्याची वेळ झाली ...


तिच्याच पहाटे ने 

त्याची झोप साखर झाली 

तिच्याच पहाटे ने 

तो राहतो निर्धास्त 

तिच्याच पहाटे ने 

तो जगतो बिनधास्त

तिच्याच पहाटे ने 

बेफिकर तो मस्त 

तिच्याच पहाटे ने ....  


त्याच्या जगण्यासाठी ती चे महत्व पहाटे पासून ! म्हणून ती ला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा ... 





बापू शास्त्री

    बापूं विषयी काय वाटतं तुला

प्रश्नावर उत्तर आलं " आता खूप सौम्य झाले, मंजूच्या लग्नात त्यांच्यासमोर जायची हिंमत नव्हती ! तसं ते मला कधी रागावले नाही किंवा काही बोलले नाही. पण.. आपल्याला नेहमी प्रेमच दिलं त्यांनी ... घरी गेलं की टरबुज चिरून दे पेरू पपई खायला देत त्यांनी प्रेमाने खायला घातलं.... असं नाही रागावले कधी पण भीती वाटायची , आता कळत त्यांचा स्वभाव तापट आहे पण मनातून प्रेमळ आहेत ... फणसासारखे ' 

           बापु समजून घेताना... मिनल नी छान सुरवात करून दिली . मागच्या पिढीतल एकमात्र " कला ' जोपासणारा कुणी असेल तर ते बापू ! त्यांनी काढलेले मधुबाला चे चित्र माझ्या संग्रही होते , आई सांगायची बापूंच्या चित्रकलेची महती ! 

  सगळे कलाकार वागण्यात बोलण्यात मनस्वी असतात . त्यांना व्यक्त व्हायला त्यांची कलाच असते . ती बापूंच्या बोटातून कधीच सटकली अन् महसूल खात्याच्या रुक्ष वातावरणात रमली . .. 

     बापू कुणाला बेफिकीर , बिनधास्त , कुणाची भीडभाड न ठेवणारे वाटतीलही. मला हाच त्यांचा भाव आवडतो . पण खरंच ते तसे आहेत का ? बेफिकीर?

    तिकडे अमेरिकेत इयान चक्री वादळ धडकल्याच्या बातम्या आल्या तर पहिला फोन बापूंचा . "त्या पोराची काय हाल हवाल? सगळे ठीकठाक आहे ना ' विचारणार! भलाई मग प्रभ्याच तिकडचा पोऱ्या त्यांची विचारपूस करत असेल वा नसेल . ..

         वडीलबंधू मिलिंद फार चिडतो ... खुद की तरफ ध्यान नाही देते और और.... अनंताकडे मंजुकडे जास्त चित्त असतं त्यांचं ! ज्याच्याकडे जेव्हा आवश्यकता असते त्याच्याकडेच बापाचं लक्ष असतं बाबा ! ते बेफिकीर राहू शकत नाहीत . 

          उगा नाटक त्यांना जमत नाही जे मनात ते ओठावर. मनात एक ओठावर दुसरे त्यांना जमत नाही "भल्ला नाटकी आहे न तो' म्हणायला ते मागेपुढे पहात नाही ! मी स्वतः बेफिकर बिनधास्त जगण्याच्या प्रयत्नात असतो पण जगू शकत नाही . 

         त्यांच्या स्पष्टवक्तेपणा मुळे लवकर जवळ कुणी होत बापूनाही .मात्र जवळ झालेले नंतर कधी दूरही होत नाहीत .

  किती वर्ष विचारता 88 झाले सांगतात . बापू पोट्ट्या सोट्ट्यायची आता फिकर सोडा .तुमचे पोट्टे आता साठीत पोहोचले . आपल्याला शंभरी टकाटक पुरी कराची आहे . 

 ... दिर्घ निरामय आयुष्याच्या मनापासून शुभकामना . 


अगस्ती 

      














रामाप्पा टेम्पल Ramappa temple

 दक्षिणेत मंदिर म्हणजे आकर्षणाच केंद्र ! एक से बढकर एक मंदिर या भागात मिळतात.

   आज रुद्रेश्वरा रामप्पा टेम्पल , तेलंगणा मधील मुलगु जिल्ह्यात बघायचं सौभाग्य प्राप्त झाले. बाराव्या शतकात गणपती देवा नावाच्या राजाच्या काळात रामप्पा या वास्तुतज्ञाने निर्मिलेल्या या देवस्थानाला नुकतीच महामहीम राष्ट्रपती महोदया द्रौपदीजी मुर्मु यांनी भेट दिलेली. 

       भूकंपाचे धक्के सहन व्हावे म्हणून सँडब्लॉक टेक्नॉलॉजी चा 900 वर्षांपूर्वी शिल्पकार रामप्पा यांनी वापर करत चार दशक या मंदिर उभारणीला लावले. मंदिर जरी रुद्रेश्वरा अर्थात रामलिंगेश्वर स्वामी या देवाचे असले तरी रामप्पा च्या नावाने प्रसिद्ध आहे . 

   मंदिरासमोरील नंदी हा सुद्धा इतर शिवलिंगा समोरील नंदीपेक्षा अलग आहे . नंदिनी मान वळवलेली मात्र डोळे शिवलिंगा कडे आहेत . 

      सतराव्या शतकात भूकंपामध्ये सुद्धा मंदिराला धक्का पोहोचला नाही.

        शिवलिंगावर , कितीही कमी सूर्यप्रकाश असू द्या , स्थंभांच्या साहाय्याने प्रकाश पोहोचवल्या गेलाय! प्रकाश नेपथ्य टकाटक . 

       मंदिरात जाण्याचे अन् येण्यासाठी 526 गजराज मार्ग दाखवतात . सगळे हत्ती वेगवेगळे त्यांच्यात जरा सुध्दा समानता नाही !! 


     त्या काळातील स्त्री सौंदर्य दर्शवणारे 12 शिल्प मंदिराच्या तीन बाजूंनी आहेत. मॉडर्न रागिनी श्रीमंती पेहरावत अलंकारात हाय हिल सँडल्स घालून आहे तर स्लिम उंच ग्रेसफुल नागिनी हातात कोब्रा घेऊन विना पेहरावात असून सुद्धा देवतेची शक्ती तिच्यात आहे...

       हेअर बँड अँड ज्वेलरी नी युक्त केश सौंदर्याने नटलेली मानिनी लाजलेली आहे कारण बंदरे तिचे अलंकार खेचत आहेत. भले मोठे कानातले अन पायातले दागिने लक्षवेधी आहेत. 

       एक नृत्यांगना त डोळ्यांमधून पावरफुल इमोशन दाखवते तर एक शांती आणि सद्भावाचा संदेश देते. एक मदनिका हातात धनुष्य आणि बाण घेऊनही आहे !! 

     मंदिरात अनेक पौराणिक कथा जसे समुद्रमंथन , शिव तांडव ,नरकासुर वध , गोपिकांचे वस्त्रहरण, आणखी दिवाळी च्या कथा सुंदर रीतीने चितारलेल्या आहेत.

        आणि महत्वाचे म्हणजे मंदिर राजाच्या नावाने नाही तर शिल्प काराच्या नावाने प्रसिद्ध आहे !

       महामहीम महोदया येऊन गेल्यावर इथे गर्दी वाढल्याचे समजले ... धन्यवाद राष्ट्रपती महोदया !

      आपल्याकडे मंदिर म्हणजे पर्यटकांचे भेट देण्याचे ठिकाण, अध्यात्मिक व्यक्तींसाठी पूज्य स्थान, संस्कृतीचे आदान प्रदान करणारे ठिकाण, सांस्कृतिक वारसा जपणारे ठिकाण तसेच संस्कृती पिढी परत पुढे नेण्याचे ठिकाण... नक्कीच माझ्या दृष्टीने त्या त्या भागातील माहिती व ज्ञान देणारे ठिकाण !! 

       आम्ही ताजला सरताज केले ! मात्र ही ज्ञान मंदिरे अज्ञात ठेवली दुर्दैवी नाही का ? 



- मंगलमूर्ती शास्त्री 

तेलंगणातील वारंगलहुन 

 

       









विकास कुलकर्णी

 विक्कीभाई नावानी मित्रांमध्ये अन् मित्रंमध्येच रमणारा आमचा मित्र विकास कुलकर्णी ग्रामीण भागात आपल्या  वानेगावावर निरतीशय  प्रेम करणारा ,ग्रामीण नाळ तुटू न देता शहरात वावरणारा ...अन् भाई गिरी तर आहेच सोबतीला  !

        ज्ञानु गणु जगू सोबत भानुदास पाटील अन् असे अनेक गावातले सवंगडी भेटले का या गड्याचं काम फत्ते! फोनवर एखादा गावाकडचा कॉल आला का ... हू हू हा हा ही हि करत अर्धातास निचंती समजायची ! ती सोसायटी , ती पंचायत अन् ती शाळा नंतर बाकी . गावावर नितांत प्रेम करणारा हा दोस्त इकडेही तितकाच सगळ्यांना हवा हवासा !
            ड्रामा डिपार्टमेंट नी याला चांगला घडवला . कलाकारी जिथे दाखवायची तिथे दाखवणार . भाईगिरी करायला एक तर हाती बंदूक लागते किंवा प्रेम वाटायची तयारी ! प्रेमानं हा आपली भाई गिरी खपवातो . ... सगळे गुमान याच एकतात . अगदी नेतेलोक सुध्दा ! !

       घरात तर हा भाई राहणारच ! मोठ्या पासून छोट्या भावावर अन् घरी कुटुंबावर "भाई ' गिरी चालणारच ! सगळ्यांना घेऊन चालणे अन् जोडीला " माझं काय म्हणणं आहे ..मला काय म्हणायचं आहे '' करत ड्रामा डिपार्टमेंट कार्यरत करतो हा !
            लेकरांवर... मुलींवर याची माया त्यांच्या माय पेक्षा उजवीच ! नसता बरीच मंडळी दोस्तमित्रांमध्ये रमली का कुटुंब विसरतात . मला विकास चे या बाबतीत कौतुक आहे . " जेवली का माय ?  ' एवढी काळजी तो शंभर टक्के घेणारच घेणार . मी तरी अनुभवलय... अन् मुली तर लाघवी आहेतच !  रागीट बाबा अन् रागीट नवरा या भूमिका तो जगतोच आहे ! !
              आज गणपती सहस्त्र आवर्तनं भाले सरकारच्या शेलगावात करतोय . बाप्पा याला उदंड निरामय आयुष्य देणारच आहे ... आमच्या शुभेच्छा "किरकिर रहित'  आनंदी आयुष्यासाठी !!
            विघ्नविनाशक गणेश तुम्हा वर देव सुखदम ... जीवेत शरदा शतम !

मंगलमूर्ती शास्त्री