पानं

Tuesday, April 28, 2020

अपर्णाताई श्रद्धांजली

ताई तुम्ही अगदी सहज निघून गेल्या .एक झंझावात विसावला .इथे चार दिवस मुक्कामी यायची त्यांची इच्छा तशीच राहिली . मार्च च्या सुरवातीला मिनल ला  फोन आला होता ..."मला यायचंय ,मला आता वेणी सुध्दा घालता येत नाही , तुलाच माझ्या वेनिफनी पासून सगळं करावं लागेल '' असं मीनल कडून चारदा कबूल करून घेतले मात्र सेवेची संधी न देताच निघून गेल्या .सौ मीनल शुभांगी वर निरतिशय प्रेम वर्षावणारया ताई , शुभुच्या लग्नाला येऊ शकल्या नव्हत्या त्यांनी जालण्याला जाऊन अजित शुभागींला आशीर्वाद देऊन आल्या होत्या .मंगळागौरीला दोन दिवस राहून लग्नातल्या अनुपस्थितीची त्यांनी भर काढली होती .
       अपर्णा ताई परंपरा वादी होत्या . माझे त्यांचे काही विचार पटायचे नाही खूप चर्चा व्हायची अन त्या विचार बदलायला लावायच्या  . त्या घरी आल्या की चैतन्य  असायचं ! आईची उणीव त्या घालवायच्या . त्यांचं भारदस्त व्यक्तिमत्त्व , विचार , वाणी नतमस्तक करायची . कुटुंब कल्याण कुटुंब संस्था टिकण्यासाठी चे त्यांचे कष्ट अविरत होते . घरी पती  स्व अरुण जीचे आजारपण सांभाळत त्यांचे दौरे अव्याहत चालू होते .
      लव्ह जिहाद मध्ये धर्म सोडून गेलेल्या अनेक मुलींना त्यांनी पुन्हा परत आणले .त्याबाबतीत त्यांचे डेअरिंग अद्भुत होते . मालेगावच्या पळून नेलेली मुलगी त्यांनी स्वतः जाऊन सोडवून आणली होती !!
   पारधी समाजाच्या उत्कर्षासाठी त्यांचे काम खूप होते !!
       एक हाऊसवाईफ स्त्री वयाच्या चाळिसाव्या वर्षी शाळेत दाखल होते अन कायद्याची पदवी मिळवत वकील होते . सगळेच अनोखे !! वकिलीला सुरवात करताना लक्षात येत की कुटुंब तुटणे चुकीचे आहे जोडले पाहिजे ...घटस्फोट कमी व्हायला पाहिजे , त्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढते अन रूढी परंपराच हे काम करू शकतात ,पाश्चिमात्य विचारांचा आचारांचा , राहणीमानाचा पगडा दूर झाल्या शिवाय लग्न संस्था बळकट होणे नाही , हे लक्षात घेऊन देशभर एकट्या बळावर कार्यरत होते ...अन सगळ्या फुरोगाम्यांना टक्कर देत लोकप्रियता मिळवते हे एऱ्यागैरयाचे काम नव्हे .
          अपर्णा ताई  तुम्ही सहज निघून गेल्यात पोरकं केलंत अख्ख्या  महाराष्ट्राला !
              - मंगलमुर्ती शास्त्री

अपर्णा आजी श्रद्धांजली -शुभांगी

आज सकाळपासून जीव लागत नव्हता, कारण ही कळत नव्हतं.. खूप अस्वस्थता होती.. सकाळी सकाळी वाईट स्वप्न ही पडले.. कदाचित तेच कारण असेल अस्वस्थतेचे असे वाटले म्हणून दुसऱ्या गोष्टींमध्ये मन रमावण्याचा प्रयत्न केला..तरीसुद्धा तेच.. घरातले कामं संपल्यावर मोबाईल हातात घेताच एका ग्रुप मध्ये आईचा नुकताच आलेला मेसेज पहिला .. दुःखद निधन असा काहीसं होतं.. ग्रुप उघडताच आजींचा फोटो दिसला आणि अंगावर शहारे आले डोळ्यातून पाणी यायला लागलं .. अपर्णा आजी रामतीर्थकर गेल्या.. काय करावे कळेना .. सुचत नव्हतं...सगळे त्यांच्यासोबत घालवलेले क्षण डोळ्यासमोर उभे राहिले.. आत्ताच 14 मार्च ला मला म्हणाल्या की आई कडे ये राहायला 7 एप्रिल ला..मी येणार आहे.. माझा शेवटचा दौरा असेल तो .. तेवढाच राहणं होईल.. जवाईबापूंना सुद्धा घेऊन ये..

वाट बघत होती की कधी हे lockdown संपेल आणि आजींशी भेट होईल आणि अचानक ही बातमी ..

त्या पहिल्यांदा घरी आल्या तेव्हा मला नेमका या कोण आहेत काय करतात काहीच माहिती नव्हतं.. फक्त आईने सांगितले होते ... त्या खूप कडक आहेत ..बांगडी घाल..टिकली असू दे कपाळावर.. तशी ती नेहमीच असायची पण तरीसुद्धा भीती वाटत होती.. खूप लहान होती मी तेव्हा.. त्यांचा जबरदस्त कणखर आवाज सगळं व्यक्त करून जायचा..

पहिल्यांदा त्या घरी आल्या तेव्हा त्यांना आजी म्हणू तर त्यांना आवडेल का .. पण सगळे तर ताई म्हणतात..पण मी कसा ताई म्हणू... त्या किती मोठ्या आहेत.. असे प्रश्न होते..
त्यांनी आपुलकी नि जवळ घेत म्हटलं आजी म्हण.. माझी नात आहेस ना?

त्या दिवसापासून बाकी सर्वांकर्ता ताई आणि मला माझी आजी भेटली..

आजी घरात आल्या की वातावरण बदलून जात असत .. अगदी प्रफुल्लित होत असे.. घरात चर्चा व्हायच्या.. आजींना भेटायला येणारे लोकांची वर्दळ होत असे.. आजी प्रत्येकाचे प्रश्न एकदम स्वतःचा प्रश्न समजून सोडवत असे..
एखाद्याचं दुःख सांगताना त्यांच्या शब्दातून ती कळकळ जाणवायची..

आई च्या हातची कढी आवडत असे त्यांना खूप... नेहमी त्या आल्या की कढी करणं ठरलेलं.. मीनल मला तुझ्या हातची कढी खूप आवडते असा म्हणायच्या..

त्या पहिल्यांदा आल्या तेव्हा नुकतेच बाबा भाजप मध्ये कार्यरत झाले होते .. त्यांच्या बऱ्याच विषयावर चर्चा व्हायच्या.. त्यांना बाबांच्या कामाची जाणीव झाल्यावर, कोणतीही औरंगाबाद ची बातमी कळली की बाबांना फोन असे.. बिनधास्त पणे..

आजीच्या सोबत राहण्याचा त्यानंतर खूपदा योग आला त्यांच्या सोबत राहून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या.. त्यांच्या व्याख्यानातून त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या .. त्या गोष्टी त्यांच्या वयक्तिक जीवनात सुद्धा पाळत असत.. आजच्या पिढीला त्यांच्या बऱ्याच गोष्टी न पटण्यासारख्या होत्या ..पण त्याचं सुद्धा समाधान होत त्यांच्याकडे.. कारणासहित..

माझ्या लग्नाला येऊ शकल्या नाही म्हणून वेळात वेळ काढून जालन्याला माझ्या घरी यायचे नियोजन केले.. आवर्जून येऊन आम्हा दोघांना आशीर्वाद दिला.. बाहेर आमच्या बाबांची Adv Sharad Wazarkar अशी पाटी बघताच मला विचारणा केली.. त्यांच्या field मधलं कोणीतरी माझ्या घरी आहे हे कळल्यावर आनंद झाला त्यांना.. खूप गप्पा मारल्या .. येताना माझ्याकरता स्वतः जाऊन विकत घेतलेली साडी आणली होती .. माझ्या आजीने घेतलेली साडी..
निघताना म्हणाल्या पुढच्या वेळेस जालन्याला अली की तुझ्याच कडे थांबेल...अगदी नक्की..
त्यांनतर माझ्या एका सणाला यायची इच्छा व्यक्त करत मंगळागौरी ला हजर झाल्या... अगदी आजीची भूमिका निभावत नातीचं कौतुक केलं..

मागच्या ऑगस्ट सप्टेंबर मध्ये सोलापूर ला आजींनी त्यांच्याशी निगडित असलेल्या सगळया कुटुंबाचं एकत्रीकरण केलं.. आई , सासूबाई , आजी-आजोबा गेले होते.. 200 ते 250 लोकांची ओळख करून देताना त्यांच्या हातात एक कागद सुद्धा नव्हतं.. आणि ओळख करून देताना नाव आणि गावच नाही तर त्यांच्या कुटुंबात कोण कोण आहे, कोण काय करतं असे सगळे सांगितले.. जानेवारी मध्ये आमच्या आईची रिटायरमेंट होती .. अगदी ते सुद्धा लक्षात ठेवून सांगितले... सर्वांची विचारणा केली..

त्यांच्या कार्याबद्दल तर जितके लिहावे तितके कमीच आहे..
वयाच्या 40व्या वर्षी अभ्यास करून एवढ समाजकार्य करण्याचं सामर्थ्य खूप कमी लोकांजवळ असते .. त्यातीलच आजी एक..

लिहिताना कुठे थांबावं हे कळत नाहीये.. सांगायला आठवणी खूप आहे..पण..



🙏🏻ओम शांती🙏🏻 
                     

                        - शुभांगी

Saturday, April 18, 2020

माधुरी ताई चे अभिष्टचिंतन 61 टोटल

समया समे पळून
गर्दीत चेंगरून
मी ही दमून आलो
ती ही दमून आली

मी बैसलो जरासा
सोफ्यावरी निवांत
प्याला करी चहाचा
घेऊन तीच आली .....

कवी शैलेश हिंदळेकर यांच्या नोकरी करणाऱ्या महिलांबद्दलच्या  कवितेत सकाळीच वाचले . खरंच आहे , मिनल दुकानातून येते न येते तोच "भूक लागली गड्या ' अस्मादिकांनी बोलावे अन तिनी शेगडीवर कढई चढवावी !!
       नवरे ,पुरुष मंडळींचे एवढे लाड पुरवायला या महीला वर्गाला कुठून एव्हढी शक्ती येते कुणास ठाऊक .
      आज हे सगळे आठवण्याचं कारण म्हणजे सकाळी माधुरीताईच अभिष्टचिंतन करायला फोन केला अन गप्पा मारल्या . घर , कॉलेज, संस्था , भाषा सभा सांभाळायचं  म्हणजे किती उठापटक !!
       आज आमच्या या ताईबाई  61 पूर्ण करत्या झाल्या , गेल्या वर्षभरात आम्हाला एकसष्टी करण्याचे त्यानिमित्त तिचे कौतुक करण्याचे सुचले नाही . ... आता पंचात्तरी दणक्यात करू !
            सौ रश्मी रमेश नाईक, निवृत्त  प्राचार्या एच ए एल स्कूल , त्यांनतर काही वर्षे मॅनेजमेंट बॉडी मध्ये ऍडमिनिस्ट्रेशन चे किचकट काम ! नासिक सारख्या शहरात संस्कृत भाषा सभेचे दायित्व पार पाडायचे , सोबत अन्न सेवा मंडळाच्या अन्न वाटप तेही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये !

             स्विटी सोनूचे लाड पुरवत ,  घरी यजमानांचा मधुमेह कंट्रोल करायचा सोबत देशस्थ ऋग्वेदी मंडळाच्या बैठकीला हजेरी लावायची , मंडळाचे पदसिद्ध दायित्व निभवायचे ,  भावाबहिणीसाठी !!
            
              भावाबहिणीसाठी यासाठी म्हणतो तिच्या ह्या ऍक्टव्हिटीचे लाभार्थी आहेत प्रशांत शास्त्री , विदुला ! आजची दुसरी उत्सव मूर्ती  अपूर्वा साठी मुजुमदार तिनेच शोधले तसे दिशापतीची  द्रुपदा हि तिचेच फाईंड .
            
             आता सगळे सोडून निवांत व्हायचा मानस तिनी बोलून दाखवला तो मीनं  चकटफु सल्ला देल्लाच .... आता तर खरे कामात राहायला पायजे नाहीतर घरात बसल्या बसल्या दुखणं काढशील ! ताई सामाजिक कामात गुंतवलं तरच समाधान अन तब्येत दोन्ही लाभतील . बाकी रहाटगाडगे तर नेहेमीचेच .

            दीर्घ निरामय आयुष्यासाठी , पंचात्तरी , सहस्त्र चंद्रा साठी शुभकामना ताई !
              

  

Sunday, April 12, 2020

पत्याच लगन

वडोद्याला बळीराम्बॉ च्या पत्या च्या लग्नाला गेलतो , बापा बापा
      सकाई 10वाजेच लगीन . सकाई पाच वाजेलाच औरंगाबाद हुन निगलो , तसं बी एक दोन घनटे तर लगीन लागायले लागतेच किनी बॉ !म्हणलं मीयुन जाईन .
    खामगाव नांदुरा खांडवी च्या रोडाणं दरमजल करत पोचलो साडे बाराले वडोद्यात . बिगी बिगी धापा टाकतच एस्टी तुन उडी मारून पयालो , लगन सापडलं तर सापडून जाईन  म्हनलं . ......  तो बैराम बॉ चौकातच  भेटले . दोनी पायावर बसेल , बहुतेक खाली मुंडकं घालून  विडी फुकत बसेल व्हते .
         त्याहिले बोल्लो का लगन लागलं वाटते ?  थ म्हणले नाही न भाऊ . लाईन मन म्हणते दोनाले लाईट देतो . माईक भोंग्या बिगर लगन कसं लावता .
     माया जीव भांड्यात पडला . म्हंजी लगन दोन वाजेपतूर लागे ना . आपण दुरून जाऊन गाठलं .
      पण बॉ इकडं काय करत व्हते चौकात . त्यायच्या घरी मंडप आसन ना . पौने रावळे सोडून बुवा इकडं कुठं !  मायी मनात पाल चुकचुकली . कायी तरी गडबड हाय .
      बिगी बिगी घरी गेलो तो ... कयलं बुवाचे सात का पाच जावाई रुसून बसेल होते , कुनाले मुदी पैजे व्हती त कुनाले सफारी .
   मधले तीन जावई तर अशे रुसले व्हते का त्यायच्या साठी आनेल  पहिल्या धारेची कॅन मास्तरनं लपून थेवल व्हती . गावातलं हे रघु मास्तर  पण फार बिगडेल व्हतं !! आता बुवांच्या घरचं लगीन मास्तर न कायला मदे मदे करा ! बैराम बॉ मास्तरचं सेतावर काम करे , अन पत्याच्या लगनाला कायी मदत बी देल्ली आसन , पन मनुन का कायदे कानून सिकवा का ? बुवाचे सगळं जावई वैतागेल होते कारन  मास्तरन सांगतलं व्हतं का लगन लागल्याबिगर दारू सारू नै ..  तिकडं लाईन मन लाईट देत नोता इकडं मास्तर टाईट हु देत नोता .
          तवा माया ध्यानी आलं का लगन घर सोडून बैराम बॉ चौका मंदी विडी सिलगाऊन का बसेल व्हते !!!
         पत्याच्या लगनाची पंगत जेवलो, मावशीच्या घरूनच वाटी पेला नेलता !  बुवाच्या घराच्या मागल्या गल्लीत पंगत होती बहुदा तिथं जेवलो . लाईन मन च काई मन झालं नई का लवकर लाईन द्यावी . चार वाजोले त्यानं . मायी परत जा ची गाडी साडेतीनाची . दोनशे मैलावरून लग्नाले गेलतो . टायमात गेलतो पन लगन काई लावू शकलो नाई . परत आलो,  हाय कीनी मज्जा ....

- अगस्ती