पानं

Friday, May 22, 2020

दासबोध ग्रंथ कैसा ?

दासबोध ग्रंथ कैसा ? सांगण्यासाठी समास पहिला ग्रंथारंभलक्षण समर्थांनी लिहिला आहे  . त्यात काय काय आहे ,थोडक्यात प्रस्तावनाच या समासात समर्थानी लिहिली आहे .
दासबोध हा गुरू शिष्य संवाद असून भक्तिमार्ग दाखवणे हा तर उद्देशच आहे .शुद्ध आत्मस्वरूप कसे, विदेहस्थिती कोणती , आणि अलिप्तता म्हणजे काय हे सांगत असतानाच उपासना कशी करावी, वेगवेगळ्या काव्यांची लक्षणे कोणती, चातुर्याची लक्षणे , प्रेमाच्या उत्पत्तीची लक्षणे , पंच महाभूतांची लक्षणे ,सृष्टीचा कर्ता धरता कोण यावर समर्थानी प्रकाश टाकला आहे .
           दासबोध 20 दशकात विभागलेला असून प्रत्येक दशकात 10 समास आहेत . प्रत्येक समास तुम्हांला समाधानाने  जगण्याची नवी दृष्टी देतो . दासबोध लिहिताना जे आधार ग्रंथ (referances) समर्थांनी अभ्यासले त्याचा उल्लेख या ग्रंथारंभ समासात उल्लेखिले आहेत . दासबोध प्रत्येकाने वाचलाच पाहिजे असा आहे . उगाच टीका करणाऱ्या बाबतीत समर्थ लिहितात

पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण ।उगा ठेवी जो दूषणं ।
                तो दुरात्मा दुराभिमान । मत्सरे करी

दासबोधातून मिळणार काय आहे ? - माणसाचे वागणे बदलते ,संशयाचे भूत माणगुटीवरून उतरते , अहंकार , क्रोध दूर होतात .अज्ञान, दुःख , खोट्या समजुती दूर होतात .शिस्त लागते , माणसाला उत्तम गती लाभते , व्यावहारिक चातुर्य सुद्धा समर्थांनी दासबोधात शिकविले आहे .

नाना धोके देहबुद्धीचे। नाना किंत संदेहा चे ।
नाना उद्वेग संसाराचे ।नासती श्रवणे ।

इतके सगळे छान छान समर्थानी लिहिलेले आपण जन्मभर वाचलेच नाही तर ... श्रवणे चुके अधोगती । ऐसी याच्या जन्माची फलश्रुती ।

अर्थात समर्थ समास शेवटी समारोप करतात ....

जयाचा भावार्थ जैसा ।तयास लाभे तैसा ।
मत्सर धरी जो पुंसा । तयास तेचि प्राप्त ।।

तुमच्या डोक्यात मत्सर असेल तर तुम्हाला तेच मिळेल !

तुमच्या डोसक्यात पिरम आसल तर लोक तुमाले पिरम दावतील ....नाही का गडे हो !

दासबोध वाचलाच पाहिजे त्यांनी ज्यांना आयुष्यात उन्नती हवी आहे . सगळे विषय त्यांनी त्याकाळी हाताळले ते आजही उपयुक्तच आहेत .समर्थ दिव्य दृष्टीचे होते ...


No comments:

Post a Comment