पानं

Monday, August 5, 2019

अतुल सावे वाढदिवस

मित्र कुणास म्हणावं ?
ज्याच्याजवळ व्यक्त होताना संकोच होत नाही,
खोटं बोलावसं वाटत नाही फसवणे तर दूरचे.
मनातली पाप पुण्य आपोआप बाहेर पडतात .
त्याच्याजवळ आपले आंनद आणि दुःख , शल्य पटकन मोकळे करता येतात तो मित्र !
मित्राजवळ आपण मोकळे-ढाकळे असतोत .
             एव्हढे मित्र पुराण ऐकवण्याचे कारण ....परवा मित्रवर्य विश्वासचा फोन आला ."आमदार साहेबांना भेटायचे आहे  .तू वेळ घेऊन दे ' मी सुचवले "अरे तूच फोन कर त्यांना '
अरे शास्त्री तुझे त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत ... विश्वास बोलला .
विश्वास तूच फोन कर , वेळ घे  you will feel friendly ,nothing less ! 
          सायंकाळी त्याचा फोन आला , "अतुलदादाचं कामच वेगळे आहे रे '' बोलला , एव्हाना तो फ्रेंडली झाला होता त्याची भेट झाल्याचे त्यानं सांगितले . त्याचे प्रॉब्लेम सुटण्याची चिन्ह त्याला दिसली . हेच वैशिष्ट्य अतुलजी सावे या व्यक्तीविशेषाचे ! लहानांपासून ते जेष्ठांपर्यंत सगळ्यांना " दोस्त ' बनवण्यात हातखंडा असलेले अतुलजी !

            आमदार म्हणून दमदार कामगिरी करायला ,मला नाही वाटत अतुलजींनी कुण्या अधिकाऱ्याला , कर्मचाऱ्याला उगीच सूनावत कामं करवली असतील .सगळे आनंदाने कार्यरत करत,  दोस्त बनवत उद्दिष्ट्य साध्य केलेली !
            मी अनेक पदाधिकारी , लोकनेते उगीचच कार्यकर्त्यांसमोर अधवातध्वा बोलतांना पाहिले , इम्प्रेशन मारायला ! अतुलजीना असं इम्प्रेस करावं लागतं नाही . त्यांना चिडून बोलतांना एकदोनदा पाहिले त्यावेळी खरेच डोक्यात तिडीक उत्पन्न करणारी स्थिती होती .

            "  असं आहे शास्त्रीजी त्याचा पक्ष विरोधात , तो " विरोधी ' निवडणुकीच्या पंधरवड्यात ! त्याच्यापासून सावध राहा पण शत्रु समजू नका ' असे इतर पक्षातल्या लोकांबद्दलचे विचार मला कवी संदीप खरेच्या ओळी आठवून जातात

"चालती माझ्याविरोधी माझि ही संगनमते
           शत्रू माझे जे , तयांचे मित्र व्हावे वाटते ! '

              अतुलजी एक " जाणिवा ' जपणारा माणूस म्हणूनही मला आवडतात . पुलवामा हल्ला झाल्यावर स्वागत पुष्प नाकारणारा , आपल्या वाढदिवसाचे सगळे उत्सवी कार्यक्रम रद्द करत फक्त सामाजिक उपक्रमांना परवानगी देणारे अतुलजी  आम्हा कार्यकर्त्यांना संस्कारित करत असतात . 
               आज अभिष्ट्यचिंतन करताना दीर्घायुष्य चिंतीताना इतकंच मागणं ,अतुलजींच्या प्रिय दैवत श्री गणेशाकडे, अजुन खूप मोठ्ठ्या जबाबदाऱ्या पार पाडू दे , जन-सेवारत राहू दे .
                
        पुण्य कर्मणा कीर्तिमार्जय
                       जीवनम् तव भवतु सार्थकम्

                    "  अतुलजी ' नावाच्या लोकमित्रास  मनःपूर्वक शुभेच्छा -मंगलमुर्ती शास्त्री .



              

कविमित्र पोहणेरकर सर

आम्हाकरिता दुर्धर चिंता ।
नाना दु:खे हाल सभोवता ,
पुरे ! नको नरतनु आतां।
दुखांची राशी !
           नकोशा झालेल्या या जगण्याला ,भौतिक सुखसुविधांच्या आजच्या  या "सुनामी'तह़ी दुःख  दुःख अन दुःख डोईवर घेवून हिडंणारे आम्ही बापुडे अन...
 सदैव सस्मित ,
सदैव अपुला
डोलत तु असतोस;
दुःख सृष्टि कधी
स्पर्शली नाही
तव (मन) चित्तास !
....अशा या तृण पुष्पाची आठव होते न होते तो ...
ही मोहकता ,
तुझी फुला ही
प्रेम निर्भरा वृत्ती ;
सदानंद हां
 उदभवेल का ?
या भू पृ ष्टा व र ती
....... ही चिंता की परत परत आम्हाला हां सदानंद मिळेल का ?  मोहकता प्रेम वगैरे जाऊ देत दुःख तर पाचविलाच पुजली आहेत ना ! मग ..

हासवितो लतिकाकुंजाना ।
प्रेमे काढी सुन्दर ताना ;
आनंदाच्या गाउन गाना ।
 आनंदे रमतो .
            असा आनंदी पक्षी आम्हास भेटतो ....
तो आमचे दुःख
लपवतो ,घालवतो,पळवतो !
तो आमचे जगणे...
सुसह्य,सुसज्ज,सुहास्य करतो
तो आमचे मनास ...
हसवतो,खेळवतो,रमवतो

तो साधकांना प्रोत्साहित करतो ,पाठ मानेचा ताण घालवतो

तो विद्यार्थ्यांना सूत्रे देतो ,जटिल ऑर्गनिक शिथिल करतो

तो आम्हाला टिप्स देतो ,कुटुंब "जल्लाद' असेल तरी अल्लद कसे निभवायचे हे शिकवतो

तो आम्हाला गमक देतो  कौतुक ओतून बेचव जेवणाला चविष्ट कसे बनवायचे हे सांगतो

तो क्रित्येकानां क्षणात हसवतो क्षणात रडवतो  "हसू आसु ' ने जगणे फुलवतो


 अशा या आमच्या मित्राच्या  "आनंदी पक्षाच्या '  कवीवर्य प्रा.  विजय पोहनेरकर सरांच्या वाढ दिवसाला, हा शुभ दिवस वारं वार येवो  हे रेणुकाआईकडे मागनं मागत , लाख लाख शुभेच्छा !

अन पुन्हा सरांकडे बालकविंच्याच शब्दात मागणं .....
 उंच भरारया मारित जाणे ।
     रूप तुझे हे गोजिरवाणे
गुंगुंन जाईल चित्त जयाने
     दे दे ते गाणे !!
     दे दे ती कवणे !!!!

--------मंगलमूर्ती शास्त्री





(ता क : कवीमित्राला शुभेच्छा द्यायला कै त्र्यम्बक बापूजी ठोम्बरे उर्फ बालकवींचे शब्द वापरल्याबद्दल ते ही मला आनंदाने क्षमा करतील हा विश्वास आहे !!!! )

परिवाराचे कुळगीत



मधुघट

Monday, March 15, 2010

परिवाराचे कुळगीत

असू आम्ही रक्ताने एकच नात्यातील
गोत्रांची किर्ती सातासमुद्रा जावो
कुलवंत घडविणे हीच मनीषा राहो
संस्कार टिकविणे हेच आमचे ध्येय
असू आम्ही रक्ताने एकच नात्यातील

'एकी'च आमुची व्हावी जनाविशेष
सर्वोच्च परंपरा ,राहाव्या कायम खास
औदार्य निभाविणे हेच आमचे व्रत
असू आम्ही रक्ताने एकच नात्यातील

गंगेचे सुपुत्र अम्ही ,शुद्धताच मनी भावो
पावित्र्य जपाविणे हेच आमुच्या ठावो
पूजा अर्चना.. असावा स्थायीभाव .
असू आम्ही रक्ताने एकच नात्यातील

सद्भाव मान्यता वाड वडीलान प्रती राहो
आशिष जमविणे हीच आमुची आस .
असू आम्ही रक्ताने एकच नात्यातील.!!!

केतकी वाढदिवस

बारीक

खारीक

किडुक

मिडुक

चवन्नी

अठन्नी

चवळी

मटकी

तुराटी

पराटी

चुणचुणीत

टणटणीत

शिडशिडीत

अशी कुठलीही विशेषणं वापरुन मी आज  शुभेच्छा देणार नाही .

आणि

डेरी मिल्क

सिल्क

Bournville

5-स्टार

ऐक्लेअर

Nutties

पर्क

किटकॅट

पोपिन्स

अलपेंलिबे



सुद्धा देणार नाही



कारण ....

आज  बाबा-बाबी च्या  संसारातील

बाहुला- बाहुलीतील बाहुली  केतकी आता मोठी होत आहे ...

 काय माहीत बाहुला कधी वाढणार ?  बाहुली

ती आज वाढणार आहे , वाढत राहणार आहे अनेकानेक वर्ष !

कधी पुण्यात इंडियात तर कधी फ्रँकफूर्ट जर्मनीमध्ये !!

कुठेही का होई ना ती वाढती राहो , खुश राहो, चुस्त राहो,

 मस्त  राहो , सहर्ष राहो, शत वर्ष राहो , चिरायू राहो

या आशीर्वादासह   -  अगस्ती मामा






दिपकदादा वाढदिवस

                कुठलाही उत्सव , मंगल कार्य साजरे करण्यासाठी घरातले काहीच लोकं शंभर टक्के देतात . ते कार्य माझे  आहे असं समजुन तन मनाने कार्यरत होतात . कार्यक्रमाच्या दिवशी त्यांच्या डोक्यात दुसरा विषय नसतो , कार्य पार पडेपर्यंत .
           सिलेंडर डोक्यावर वाहण्यापासून , ताटं वाढण्यापासुन,  स्वागतापर्यंत सर्व कामात  स्वतः ला कुणाचीही तक्रार न करता लीलया सामावून घेतात . अशी काही मंडळी आपल्याही कुटुंबात आहेत त्यापैकी एक मोठं नाव  दिपक दादा ! सगळ्या भावा बहिणींचा अभिमानाचा लाडका   ....कवतीक्या सगळ्यात पहिला म्हणून .

            हाती घेतलेले कार्य उत्साहाने पूर्णत्वाला नेणार , मग चिखलदरयाला भाऊ भाऊ पर्यटन असो का शुभु चे लग्न ! शुभांगी च्या लग्नात डोली उचलणारे दोन अधिकारी होते , एक चीफ इंजिनिअर दुसरा बँक मॅनेजर ! वय , प्रकृती, मान यांचे  भान विसरून , हरपून जाऊन कार्य सिद्धीस नेणारे ते दोघं ....
          मी तर लग्न निर्विघ्न पार पडेल याबाबत निःशंक होतो अन निर्धास्तही ,  कारण  समेवर होते आमचे हे दादा ताई  लोकं ! 
            लासुरला जुन्या घरात जेष्ठ दादांनी पाठीत धपाटा घातल्याने मी आणी कुलदीपकदादा  दोघांनी चिंचोक्यांनी सुद्धा तिर्रट खेळल्याचे आठवत नाही मात्र " रमी ' ला आम्हीच प्रतिष्ठा दिली ती आजतागायत ! रात्रीच 11 वाजता वहिनीच्या धाकाने भर  पावसात दादा मार्गस्थ झाले मात्र चार डाव खेळुनच ... महिनाभराच्या दीर्घ गॅप नंतर !! जुग जुग जियो दादा .
  
      व्यसनांबद्दल दादाला भयंकर तिटकारा . तंबाखू,  बिडीकाडी ,  अजिबात सहन होत नाही . सगळे काही शिस्तीत असते , बेशिस्त फक्त 104 दोस्तांसोबत !
        निसर्गोपचार बऱेच वर्ष दादांनी अमलात आणला .आम्ही चार सहा महिन्यात,  त्याचे फायदे लोकांना सांगण्यापूरते  आठवणीत ठेवले !!
           बँकेत आकडेमोड , हिशेब करण्यात जबरी माणूस !! मोठ्ठ्या टोटला क्षणात करून टाकतो .
      कुटुंब वत्सल तर आहेच किंचित मुसोलिनीच्या तिथीवर जन्माला आल्याने थोडी हिटलर शाही ,  दादागिरी घरी करतो ! पण लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची क्षमता ठेवत असल्याने जवळच्यांना दुष्काळाचे चटके बसत नाहीत !
        
       इ गो चा अन त्याचा दूरपर्यंत संबंध नाही असे प्रशांतला दिशानी मॉर्निंग वॉकला दुपारी जातांना सांगितले म्हणून ते खरे म्हणायचे !! (प्रशांत सकाळी कधी उठत नाही झोपेतून )

         वाढदिवस चिरायू होवो . "अब तक छप्पन ' मध्ये जातांना गुडघे , शुगर, बीपी  असे श्रीमंती दुखणे दूर राहो . दीर्घ निरामय आनंदी आयुष्याच्या शुभकामना .




ता क : जाता जाता सांगणे एकच आता केसांसाठीचा खर्च कमी करा , कंगव्याचाही खर्च वाचेल (  सल्लागार  ?)
     

       

Saturday, August 3, 2019

छोटी विदुला पदे वाढदिवस

जीवन-पथ जो कंटकमय हो
विपदाओं का घोर वलय हो
किन्तु कामना एक यही बस
प्रतिपल पग गतिमान चाहिए

माँ बस यह वरदान चाहीये ....

संघाचं हे सुंदर अर्थपूर्ण गीत " मधूघट ' साठी कॉपी पेस्ट करणारच होतो ...मधूघट उघडले अन छोटीचा वाढदिवस असल्याचे कळले .पुढची कडवी कट केली अन छोटी आठवली ..

         छोटीसाठी  (सौ विदुला पदे मॅडम) गेली दोन तीन वर्षे खरेच परीक्षा पाहणारी गेली . संसाराचं रहाटगाडगं ओढतांना सगळ्यांनाच मागे पुढे व्हावे लागते,  जीवनपथ कंटकमय आहेच , संकटांचा मुकाबला करावा लागतो मात्र अचानक गणेश च्या तब्येतीनी छोटीला दोन वर्षांपूर्वी " विपदाओ का घोर वलय ' कशाला म्हणतात ते दाखवून दिले !
           तीनी एकटीनं सगळं झेललं ! " तुला एकटीला सगळं सांभाळायचं आहे छोटी बाकी आम्ही आहोच ' असा भरवसा देत तिचं मनोधैर्य तेवढं वाढवण्याचं काम अस्मादिक करत होते .  प्रत्येकाला स्वतःलाच स्वतःशी  संघर्ष करावा लागत असतो , मन खंबीर ठेवावं लागतं  !  जे तीनी उत्तम ठेवले ....
              दुर्धर आजारातून नवऱ्याला बाहेर काढलं अन पुढ्यात मुलगी लग्नाची ! लग्न छान केलं एकहाती . सगळे छान छान झाले . चिरंजीव स्वतः स्वयंपूर्ण आहे "अभ्यास आता बस कर ' म्हणून सांगावे लागते !
               छोटी गुडडी नानांच्या लाडक्या ! अर्थात गुडडी ,  पहिले पासून स्वतःच लाड करवून घेणारी त्यामुळे तिचे कौतुक जास्त  सगळ्यांना ! माझ्या सगळ्यात जवळ रहाणारी  म्हणूनही गुड्डीच भाव जास्त घेऊन जाते ! त्यामुळे छोटी अन बबडी कडे थोडे दुर्लक्ष होते याला संपूर्णपणे मीच दोषी आहे . ...
                आता छोटीचा वाढ दिवस , विसरलो !
थँक्स " मधूघट ' (गुडडीला 14 ऑगस्ट ला नक्की भेटेन ! )  ! शुभंकर होवो , सुखदायी,आरोग्यमयी,  चिरायु होवो !

   छोटी आम्ही कुणी तुझ्या कामात पडो न पडो ...
" प्रतिपल पग गतिमान चाहिए ..
             माँ बस यह वरदान चाहीये ! एव्हढीच प्रार्थना - अगस्ती